Thursday 12 September 2019


!! गणपती बाप्पा मोरया. !!

प्रचंड धावपळ चाललेली आणि मनात धाकधूक.
ह्या वर्षी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायला जमणार नाही.
आपण इकडे, आई, बाबा तिकडे.
 त्यांना मूर्ती आणण, बसवणं सगळं जमणार नाही.
त्यापेक्षा मातीचा गणोबा बसवू. आणि रोजच्या पूजेतील बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू.
कसतरीच वाटत होत पण काहीच इलाज नव्हता.
आता पुढे काय करायचं आणि कसं करायचं याचे आराखडे मनातल्या मनात बांधत त्याचा प्रवास चालू होता.
पावसाने तर थैमान घातलाय. हा पण माझीच परीक्षा बघतोय? आणि तीही आत्ताच.
सांगलीतून गाडी सुटली पण अहमदाबादला कधी पोहचेल देव जाणे. गाडी आली हेच नशीब. तब्बल पाच तास उशिरा. गाडी कॅन्सल झाली नाही, उशिरा का होईना पण आली आणि परत अहमदाबाद्ला जायला निघाली... केवळ दैव बलवत्तर म्हणून. ड्राइवर म्हणाला पाच तास बडोद्यामध्ये गाडी अडकली होती. "सेठ को बोला वापीस अहमदाबाद को लेता हूँ, तो  वो उखड गया, सालेने मना किया" तिथली परिस्थीती त्या सेठला काय माहित असणार म्हणा? .मोठ्या धाडसाने त्याने बस बाहेर काढली असणार. "हॅट्स ऑफ डिअर".ड्रायव्हरचे मनातल्या मनात त्याने आभार मानले. तो सांगलीतुन अहमदाबादला जायला निघालेला. आई बाबां सांगलीत आणि बायको व कन्या अहमदाबादेत.

 बायकोने कमीत कमी शब्दात सांगितलं होत,  "पाणी भरलय, पार्किंग लॉट पाण्याखाली आहे, दोन दिवस लाईट नाही, चार्जिंग संपत आलाय , नेटवर्कपण मिळत नाही, प्यायचं पाणी आणि खर्चाचं पाणी संपलंय  अपार्टमेंटमधील सर्वानी आपापल्या गाड्या बाहेर काढल्यात, आपलीच गाडी खाली अडकलीय" फोन कट झाला ...  " अशातच भरीस भर म्हणजे, ह्यावेळी आपण इन्शुरन्स काढलेला नाही?" त्याच मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.

 "पाणी अजून ओसरल असेल का? हायवेला उतरलो तरी घरापर्यंत पोचता येईल का?" ह्या प्रश्नांनी तो परत भानावर आला.
किती विचार येत होते मनात आणि तेव्हढ्याच समर्थपणे तो त्या विचारांना टोलवत होता.

 तीन दिवसांसाठी म्हणून घेतलेली सुट्टी आता तब्बल बारा दिवसांची झाली होती. ऑफिस मध्ये कारण देऊन तो मेटाकुटीला आला होता. अजून इथल काम संपलेलं नव्हत... अर्धवटच होत.. महत्वाचे निर्यय घ्यायचे होते. दोन दिवस बायकोचा फोन लागत नव्हता, व्हाट्सअँप पण बंद होत. आणि अचानक शेजारील पटेल भाईचा मेसेज आला. "भाभीजी का मोबाइलला डिस्चार्ज हुवा हैं. इसलिये मुझे आपको बोलने के लिये कहा हैं. हम लोग हैं यहाँ,आप फिक्र मत करो."
पोचला हायवेला. रस्ता बंदच होता. रिक्षावाल्याने सात किलोमीटर लांबून फिरवून घरी पोचवलं. काहीही न बोलता, कसलीही तक्रार न करता कामाला जुंपून घेतल त्यानं. घरी फोन करुन सांगितलं व्यवस्थित पोचलो आणि इथही व्यवस्थित आहे.
कन्येची शाळा बंद होती. मित्रांना फोन करून मोबाइल चार्जिंगची व्यवस्था केली, अंघोळीची, पिण्याच्या पाण्याची तजवीज , दोनचार दिवसांठी जेवणाचा डब्बा लावला, गाडी पाण्याबाहेर काढून टोविंग करून सर्विसिंगला पाठवली.. इन्शुरन्स नसल्यामुळे जो होईल तो खर्च मान्य केला पण गाडी कधी मिळेल याची शाश्वती नाही हे मान्य करूनच. पाणी ओसरल पण लाईट यायला पाच दिवस लागले. सगळीकढेच पाणी भरल्यामुळे ऑफिस बंदच होत. हेच एक काय ते मनासारखं.
पण सांगली कोल्हापूर अजूनही  पाण्याखालीच होते. चारही बाजूनी संपर्क तुटल्यामुळे परत तिथे जण शक्य नव्हतं पाणी ओसरून वाहतूक सुरु होण्याची वाट बघणे हेच हातात होत.
सांगलीतले  बारा दिवस क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोरून गेले.
"मी आलो कि लगेच दवाखान्यात जाऊ. डॉक्टर काय म्हणतात ते पाहून ठरवू" त्याने आईला समजावलं आणि फोन ठेवला होता. तिथली दृश्य त्याला परत, परत आठवत होती. पायाला झालेली जखम बरी होत नाही तेंव्हा पायासाठी अँजिओग्राफी करू, तसच मग हृदयाची पण करून बघू कारण पुढ काही धोका आहे की नाही हे कळेल. असा विचार करूनच तो बाबांना घेऊन दवाखान्यात गेला होता.

 दोन तासात ट्रीटमेंट होऊन दुपार पर्यंत बाहेर पडाल अस ऐकून सकाळी नऊ वाजता गेलेले ते, रात्री अकाराला घरी पोचले.तो सोडून सर्वजण आनंदी कारण फक्त पायात ब्लॉकेज आहे आणि एक साधी शस्त्रक्रिया केली की झालं. काळजी करण्यासारख काही नाही. बायकोला पण तेच सांगितलं म्हणजे ती अहमदाबादला निर्धास्त.

"आई आज ती सीडी मिळणार आहे, चल आपण जाऊन घेऊन येऊ. दवाखान्यातून येताना तुला भाजी आणि फळं दोन्ही आणता येतील". कदाचित आईच्या मनात पाल चुकचुकली असणार! कारण काहीही न विचारता ती चल म्हणाली. वडील पण पेपर वाचण्याच्या निमित्याने बाहेर सोफ्यावर येऊन बसले.

"युनिव्हर्सिटी कडून जाऊ म्हणजे ट्राफिक लागणार नाही आणि वाटेतच तुला भाजीवाले आणि फळवाले पण दिसतील." गाडी सुरु करता करता तो म्हणाला. "सगळं ठीक आहे ना रे?" आईने काळजीच्या स्वरात विचारले. तिचा अंदाज खोटा नव्हता. दवाखान्यातून येताना झालेला उशीर आणि काळजीचे काही कारण नाही ग आई ह्या त्याच्या उत्तराने, काही तरी आहे हे तिने ओळखल होत. त्याची आईच ती, त्याला ओळखणारच ना!

"पायात ब्लॉक आहे आणि हृदयात पण". काल डॉक्टरांनी जेंव्हा मला आत बोलावलं होत तेंव्हा सांगितलं कि "तीन ब्लॉकेजेस आहेत हृदयात. ट्रिपल व्हेसल डिसीज. ब्लोकेजेसचे प्रमाण पण जास्त आहे ९०%. लवकर निर्णय घ्या. प्रायोरिटी ठरवा! आधी पायावर उपचार करणार कि आधी हृदयावर?"
बाबांचं नशीब खूप चांगल आहे.  की एव्हडं ब्लॉकेज असूनही काही धोका अजून जाणवला नाही. सुदैवाने आपल्याला लवकर कळलंय तेंव्हा प्रत्यक्ष हार्ट अटॅक येईस्तोपर्यंत वाट न बघता आपण लवकर ट्रीटमेन्ट चालू करू. कारण जर अटॅक आला तर तो सौम्य नक्कीच नसणार, ब्लोकेजेसच प्रमाण जास्त आहे आणि जी हानी होईल ती न भरून निघणारी असेल.

आईने डोळ्यातील पाणी अत्यंत प्रयत्नपूर्वक लपवले. क्षणभर मुलाची परिस्थिती तिच्या लक्षात आली.  तो वयाच्या मानाने काल पासून किती समजूतदारपणाने वागतोय , परिस्थितीने आलेलं शहाणपण नाही हे.. तो आहेच तसा कणखर.

"मग आता आपण कस करूया?" नकळत तिने प्रश्न केला. "सर्व ठीक होईल ग आई, चल आपण डॉक्टरना तर आधी भेटू." दवाखान्याजवळ गाडी थांबवत तो म्हणाला.दोघेही गडबडीने दवाखान्यात शिरले. आईला जिने चढता येणार नाहीत हे ओळखून तिला तिथेच रिसेप्शन जवळ बसवून तो दुसऱ्या मजल्यावरील ऑपेरेशन थिएटरला  गेला. पाचेक मिनिटात तिला घेऊन डॉक्टरना भेटायला वरच्या मजल्यावर पोचला.
"बायपास हा आमचा पहिला पर्याय आहे कारण तिन्ही नलिकांमध्ये ब्लॉककजे चे प्रमाण जास्त  आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या" डॉक्टर काळजीच्या स्वरात म्हणाले. "डॉक्टर दुसरा काही पर्याय?" त्याने हिम्मत करू विचारलं. "ऍंजिओप्लास्टी करता येईल पण काही ठिकाणी औषधाने मॅनेंज करावं लागेल आणि स्टेंट्स पण जास्त लागू शकतील..."
दोघे सीडी घेऊन बाहेर आली. तो म्हणाला "आपण अजून एक दोन तज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेऊ मगच निर्णय घेऊ." भाजी घेत असताना आई म्हणाली "आपण मोठ्या काकांना सांगू सर्व आणि मगच सेकंड ओपिनियन साठी जाऊ".  " एकदम माझ्या मनातला बोललीस आई, मी पण हाच विचार करत होतो." मग बेळगाव मधील एक प्रसिद्ध हृदयरोगाचे सर्जन आणि कोल्हापूर मधील अजून दोन तज्ज्ञांचे सल्ले घेतल्यावर ते अँजिओप्लास्टीच्या निर्णयावर आले. दिवस ठरवला पण अहमदाबाद मधील पाणी भरल्याच्या बातमीने त्याला तातडीने जावेच लागले, तिथली परिस्थीती पण थोडी गंभीरच होती म्हणा.

सांगलीकडे जाणारे रस्ते खुले झालेत आणि वाहतूक पूर्वपदावर आली हि बातमी कळाताच त्याच दुपारच्या गाडीने बायको आणि मुलीला घेऊन तो पुन्हा बाहेर पडला. मुलीची शाळा, स्वतःचे ऑफिस ---- जे होईल ते बघून घेऊ आता या क्षणाला फक्त ऑपेरेशन महत्वाचं... त्याने स्वतःला परत बजावलं.
डॉक्टरना भेटला, दिवस आणि वेळ ठरली. आदले दिवशी दवाखान्यात दाखल झाले. टेस्ट्स केल्या. उरलेल्या टेस्ट्स दुसऱ्यादिवशी करून अँजिओप्लास्टीसाठी बाबांना ऑपेरेशन थिएटर मध्ये घेतलं. "कॉम्प्लिकेशन बघता एक, किंवा दोन किंवा चारसुद्धा स्टेण्ट लागू शकतील." त्यांनी डॉक्टरांना होकार दिला. तासाभरात डॉक्टरांनी परत आत बोलावलं. "एका स्टेण्टवरच काम झालं. काळजी करण्यासारखं काही नाही. दोन दिवस बाबा देखरेखीखाली राहू देत, मग घरी सोडू...."

खूप प्रचंड ताण एक्दम नाहीसा झाला. "आता सहा एक महिन्यांत पायाचा पण असाच इलाज  करू. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल". डॉक्टरांचे शब्द कानी पडताच मागील महिन्याभराची धावपळ सार्थकी लागल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकले. एक आठवड्यात वडिलांचे पहिले चेकअप करून, ऑल इस वेल ऐकून अहमदाबादला परत जाण्याचे बस बुकिंग करण्याच्या मार्गी लागला. ह्या सगळ्या गडबडीत, वडिलांची औषध, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, ह्यात पंधरा दिवस कसे गेले ते कळलेच नाही. गणपतीची तयारी करायलापण वेळ मिळाला नाही. दुसऱ्या दिवशीचे गाडीचे बुकिंग करून, सामानाची बांधाबांध करत असताना मुलगीचा छोटासा अपघात, जीवावर आलेलं पायावर निभावलं. पळत असताना समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. ड्राइवरने वेळीच ब्रेक मारला. उजव्या  पायाचा घोटा पूर्णपणे सोलून गेला.

नवीन जबाबदारी  बरोबर घेऊन परतीच्या प्रवासाला सुरवात. पण गणपती ह्यावेळी कसा बसवायचा हा प्रश्न कायमच होता. पुढच्याच आठवड्यात प्रतिष्ठापना होती. सुट्टी मिळण्याचे एकही कारण शिल्लक नव्हते आणि सगळ्या सुट्ट्या पगारी रजा धरून, केंव्हाच संपल्या होत्या.
त्यामुळे मातीचा गणोबा बसवूया आणि रोजच्या पूजेची चांदीच्या मूर्तीची स्थापना करूया, म्हणजे आई आणि बाबा दोघेही सगळं सांभाळतील. ठरलं तर मग सगळ्यांचं. गाडीत बसल्यावर थोडं समाधान थोडं चुकल्यासारखं... पण बाबांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्याचं समाधानच जास्त महत्वाचं. त्रिकोणी कुटुंब घरी परतलं... मुलीच्या पायाची काळजी करत

गौरी गणपतीचा दिवस आला. घरी बोलणं झालं. बोलण कसलं? विडिओ कॉल. छोट टेबल सजवलेलं त्यावर पाट मांडून, गणोबा आणि पूजेची गणपतीची मूर्ती विराजमान झालेली बघितली. वडिलांची तब्येतपण एक्दम व्यवस्थित. औषध, पथ्य सर्व वेळच्यावेळी होत होती हे बघितलं.... विडिओ कॉलने खरंच घराबाहेर, दूरवर राहणाऱ्या मुलांची खूप छान सोय केलीय..
छोटासा गणोबा, गणपतीची पूजेची मूर्ती बघून लेकीचा हट्ट सुरु झाला, बाबा मोठा गणपती आणूयाना . हो रे राजा आणूया आपण, पण पुढच्या वेळेला. आबा कस जाणार सांग एवढ्या लांब मूर्ती आणायला, आणि विसर्जनाला पण कस जाणार सांग. आणि आत्ता बघितलास ना तू छोटा गणोबा. त्याच पण खूप महत्व असत आणि आपण तो बसवलाय ना... मग.

परत पंधरा मिनिटांनी लेक लंगडत लंगडत फोन घेऊन आली. "बाबा, आजीने परत विडिओ कॉल करायला सांगितला आहे, लावा ना".  "आण इकडे लावतो. आरती करायची असेल ना आबांना. चला आपणपण आरती म्हणू त्यांच्या बरोबर".
विडिओ कॉल आईने उचालला, पाहतोय तर काय..... मखरात शाडूची सुंदर मूर्ती विराजमान झालेली... आबा आणि आज्जी हसतमुखाने पूजेच्या तयारीत.   आई हा काय प्रकार, पंधरा मिनिटांपूर्वीच आपण बोललो आणि छोटी चांदीची मूर्ती म्हणजे रोजच्या पूजेची मूर्ती होती ना तिथे, मग आता हि मोठी मूर्ती कुणी आणली??

"अरे नमूच्या आईने आणली. आपला विडिओ कॉल झाल्यावर मी पूजेची तयारी करायला म्हणून उठले तोच बेल वाजली. दरवाजा उघडला तर नमुची आई गणपतीची मूर्ती आणि नमुला घेऊन हजर. तुम्हाला विचारत बसले असते तर तुम्ही नकोच म्हणाला असता. म्हणून मी आणि नमु दोघी गेलो गणपती आणायला. पहिल्यांदा नेहेमीची मूर्ती पसंद केली मग लक्षात आलं कि दादा आणि सुनबाई तर तिकडे, विसर्जनाला आबांना कस जमणार? मग शाडूची मूर्ती घेतली. म्हणजे विसर्जन घरीच करता येईल तुम्हा दोघांना. आणि विसर्जन केल्यावर त्या मातीतून झाड पण उगवेल बाप्पाचा प्रसाद म्हणून. मग काय घेतली हि मूर्ती आणि आलो घेऊन. तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.. आणि गणपती पाटावर ठेऊन त्या दोघी त्यांचा गणपती आणायला गेल्यापण. आज संध्याकाळची भांडी घासायला आणि स्वयंपाक करायला थोड्या उशिरा येईन काकु, अस म्हणत बाहेर पडल्य दोघी, तशाच अनवाणी पायाने कारण आता त्यांना, त्यांचा बाप्पा घरी आणायचा होता ना"...
आम्ही सारेच निशब्द.. बाप्पाच तो... बाप आहे तो आपला.. न मागता सर्व काही देतो याची वारंवार प्रचिती येती ती अशी.
सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू...
"थांब आई, आधी नमूच्या आईला कॉल करतो मग आपण आरती करू"
"गणपती बाप्पा मोरया, नामूच्या आई... तुषार बोलतोय अहमदाबादहून... आज बाप्पा आम्हाला पावला. स्वतःहून आलाय आमच्या घरी......" "गणपती बाप्पा मोरया"
तुषारदादा इकडची काळजी करू नका तुम्ही. आम्ही इथे असेतोवर तर अजिबात काळजी करायची नाही....दोन दिवस झाले रोज चुकल्यासारखं वाटत होत, गणपतीची तयारी दिसत नव्हती घरात आणि आज काकू म्हणाल्या कि रोजच्या पूजेची मूर्ती आणि गणोबा बसवणार आम्ही ह्यावेळी. .. मलाच कसतरी झालं. मग ठरवलचं, आपणच  बसवू गणपती काकूंच्या घरी"
आमची गौराई बोलत होती... डोळ्यात आनंदाश्रू येत होते आणि बाजूला लेकीचा जयघोष सुरु होता " गणपती बाप्पा मोरया.. गणपती बाप्पा मोरया..."-------------------------- केदार प्रकाश  पाटील.








Friday 7 December 2018

पानगळ


आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.

वसंताच्या आगमनाची,
शिशिरात्मक सुरुवात.

जुने, जाणते,
ज्यांचा विसर्ग व्हायलाच हवा असे,
जडत्व आणणारे,
ज्यांच्या कुबड्यांवर विसंबून आपण स्वतःला मोकळं समजतो,
असे काहीसे...

विचार....

जे गळून पडत असल्यामुळे,
आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.


ज्यांच्या जोखडातून आपण मुक्त होत असतो,
आणि घालत असतो साद _ _ _
आपलीच . . . आपल्यालाच . . .
आणि ऐकू येतात आपल्याला तेजस्वी, ओजस्वी शब्द...
साथ देणारे,
उद्याच्या यशाची ग्वाही देणारे,
काही शब्द...

आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.



Saturday 11 August 2018

अनुभव 

प्रवास म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो. जस कवितेत कुणीतरी लिहिलंय ना  की अनुभूती हि नित्य नवी अन सदा जुनी. साध ऑफिसला जायच  म्हणजे काय तयारी करावी लागते हे फक्त जाई त्यांच्या वंशा तेंव्हा कळे.  साध्या सध्या गोष्टीसुद्धा खूप अवघड वाटू लागतात जेंव्हा ऑफिस  बस पकडायची असते. एकतर बस स्टॉप हा आपल्या  घराजवळ असतो, अगदी दोन मिनिटांच्या , सहज चालत जाण्यायोग्य अंतराचा. पण हेच अंतर मैलांसारखा होऊन जात जेंव्हा सकाळी थोडासा उशीर होतो. जास्त नाही, पाच दहा मिनिटांचाच, पण तीच पाच दहा मिनिटे  आपल्याला ब्रह्मांड आठवून देतात. माझ्या बाबतीत तर हे अगदी नित्याचाच झालय.  मी बस स्टॉप जवळ पोहोचावं तोपर्यंत ती आपल्या  डोळ्यासमोरून निघून  जावी, आणि सहकाऱ्याला हाक मारावी, तर त्याने ऐकून न ऐकल्यासारखं करावं किंवा खरंच त्याला ऐकू न जावं. मग थोडा बसचा पाठलाग करून थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न. मागून येणारी एखादी टॅक्सी, कॅब किंवा रिक्षा करून पुढील स्टॉपवर जाऊन थांबायचं एवढच माझ्या हातात. ह्या साऱ्या धावपळीत होणारा मनस्ताप. पण हा मुद्दाच नाही बोलण्याचा. या प्रवासात मिळणारा अनुभव हाच खरा मुद्दा आहे.
प्रवास ह्या विषयावर आधीच खूप जणांनी लिहून ठेवलय, त्यात मी काय अजून भर घालणार म्हणा. पु लं ची म्हैस आठवतेय का? नाही म्हणणारा विरळाच. त्यांचा पेस्टनजी बरोबरचा रेल्वेचा प्रवास, म्हैस या कथेत कोकणातील प्रवास वाचताना डोळ्यासमोर एखादा प्रसंग घडत आहे व तो आपण स्वतः तिथेच उभ राहून अथवा त्या पात्रांपैकीच एक होऊन पाहत आहे असं माझ्यासकट प्रत्येक वाचकाला वाटत असणार. इतकं प्रभावीपणे लिहिता याव हि एक सुप्त इच्छा.
बस स्टॉपवर उभं असताना गाडीची वाट बघता बघता इतर बारीक सारीक निरीक्षणे करणे हा एक विरंगुळाचं आहे. जो खूप साऱ्या आठवणी आणि अनुभव देऊन जातो. जरा आपल्या सकाळच्या व्यस्त कार्यक्रमाचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर खूप सारे प्रसंग डोळ्यासमोर तराळतील.  घरातून बाहेर पडताना " अरे रुमाल घेतलास का?" किंवा "अहो पंचिंग कार्ड, मोबाइल आणि चार्जर घेतला का?" असे प्रश्न सर्वांच्याच कानावर पडत असतात, आणि आपण हो सर्व घेतलय बरोबर म्हणत पटकन बूट पायात सरकवत असतो किंवा बुटांची लेस बांधत असतो. ह्यावेळी प्रश्न विचारण्याचा चेहेरापण न बघता घाईने दरवाज्यातून बाहेर पडतो. आणि एक छानसा अनुभव घ्यायचा राहून जातो. आता पुढच्या खेपेस जरा मग वळून बघू की समजेल दरवाज्यापाशी कुणाची आई, पत्नी वाहिनी किंवा बहीण उभी असते जी समाधानाने बघत असते गडबडीत जाणाऱ्या व्यक्तीकडे. थोडीशी चिंतापण जाणवेल त्या हसऱ्या चेहेऱ्यात, की भाजीत मिठंतर  जास्त नाही ना पडलय, किंवा बस चुकू नये म्हणजे झालं अशी काळजीसुध्धा. कधी एखादा चिमुकला हात टाटा करत हालताना दिसेल तर कधी येताना माझ्यासाठी चॉकलेट आणा बाबा... अशी छानशी मागणी. तर कधी मी आज नक्की लवकर येतो पिलू, मग जाऊ आपण फिरायला, आणि हे ऐकल्यावर एक निरागसपणे  लुकलुकणारे डोळे आणि एक खट्याळ हसू जे सांगत असत मला माहित आहे बाबा खोटं बोलताय तुम्ही .. पण हे सार आपण अनुभवतो का?

 रोज ऑफिसच्या बस मध्ये पुढच्या रांगेत खिडकी कडेला एक व्यक्ती नेहेमी आढळते.  तीच जागा आणि तीच व्यक्ती हे एक समीकरणच होऊन बसलय माझ्यासाठी. चेहेऱ्यावर एक मिश्किल भाव.  सदा आनंदी आणि उत्साही. पावसाच्या दिवसात आपण पावसाची तक्रार करत असताना हा मात्र अगदी आनंदाने त्याकडे बघत असायचा. 


   

Thursday 9 August 2018


एक विचार ... 



आपलेच दात आणि आपलेच ओठ,
मूग गिळून चिडी चूप....

आळी मिळी गुप चिळी ,
बळी तोच कान पिळी ....

तूप, दूध, वरण, भात,
वाटप म्हणजे मापात पाप....

सर्वेक्षण, संवर्धन, संरक्षण, आरक्षण,
नाव मोठं, आणि खोटं लक्षण....

लोकं  जमावी, तर डोकी चार,
दर्दी कमी, आणि गर्दी फार....

खायला काळ आणि भुईलाभार,
मिळेल ते भरून, होईन पसार....

पटलं तर ठीक, नाहीतर काय,
कुणासाठी  कुणाचंही , अडतं नाय .....

Saturday 4 August 2018

विडंबन -
मूळ कविता - फटका 
कविवर्य - अनंत फंदी



आजच्या जीवनातले एक वास्तववादी चित्रण, ज्यात आपल्याला जाणवते कृत्रिमता, ढोंगीपणा, व स्वतःच्या फायद्यासाठी गैरमार्ग अवलंबून केलेले कृत्य. हाच मुद्दा मांडण्यासाठी विडंबन कविता ......... ह्या विडंबनासाठी कविवर्य अनंत फंदी यांची, अथवा प्रकाशकांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व...



कवितेचे नाव - झटका 

रडत वाट तुडवीत जाण्यापरी, लुटालूट कधी सोडू नको
संसारामध्ये काय ठेवले बाई - बाटली विसरू नको

मीच मोठा शहाणा आहे, स्वतःला कमी कधी लेखू नको
आपल्या मोठेपणासाठी, इतरांची गय कधी करू नको.

स्वहितासाठी सर्व करावे, कशातही कमीपणा मानू नको,
अरे खुशामत काय चीज आहे, पाय चाटण्या लाजू नको.

दारू, मटका, जुगार, चोरी, लाचखोरी, नाही म्हणू नको,
पैशांसाठी वाट्टेल ते कर, मागे फुडती पाहू नको.

आपल्या गाठी धनसंचय कर, हवाला घोटाळे वर्ज्य नको,
सात पिढ्यांची तरतूद करूनही, आठवीला तू विस्मरू नको.

झटपट पैसा, गाडी बंगला, मिळवायला तू कचरू नको,
घाम गाळत जगण्यापेक्षा, सोपा शॉर्टकट विसरू नको.

हजारो "तुषार" रेकूनी गेले, त्यातील तू एक होऊ नको,
अनंतात एक आहेत "फंदी" , फटक्यास त्यांच्या जगी तोड नसो.


Sunday 22 July 2018

सहजता

कस असता ना, एखादी गोष्ट सहज मिळाली, त्यासाठी काही कष्ट करायला लागले नाहीत की आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. हे काय होणारच होत, अस म्हणून त्या गोष्टीकडे कानाडोळा करतो. पण जेंव्हा साध्यासाध्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाकुल्या दाखवतात, किंवा आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, किंवा होणार होणार म्हणत असताना घडून येत नाहीत तेंव्हाच आपल्याला त्यांचे महत्व कळते. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला जीवन कस जगायच हे शिकवतात. आपल्याला जीवनाचे धडे देतात. आपले जीवन समृद्ध करतात. फक्त आपण त्यांच्याकडे डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे. त्याना कमी न लेखता, आपुलकीनं त्यांच स्वागत करून, त्यांना गोंजारून, जर विचारलं की, " अरे बाबा, आज कस येण केलस तू? आज काही  विशेष आहे का?" मग बघा ती छोटीशी  गोष्ट कशी साखरेसारखी पटकन विरघळून जाते व त्या घटनेचा खरा अर्थ आपल्याला उलगडून दाखवते.
उदाहरण म्हणून एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्याच मित्राने मला ऐकवलेला. "अरे परवा छोकरा शाळेत जायला नाही म्हणत होता, रडून रडून घर डोक्यावर घेतल त्याने. कारण काहीच नव्हतं, सकाळ सकाळची वेळ यार? मग काय दिले फटके. कदाचित जरा जास्तचं  मारले असतील  रे, कारण बायकोने पटकन हात अडवला माझा . पोर पण हुमसून हुमसून रडलं. लहान असल्यामुळे त्याने मुकाट्याने मार खाल्ला. उलट सुद्धा बोललं  नाही. रडत रडत आवरलं आणि रडतच शाळेत गेलं." कदाचित माझा अहंकार क्षणिक सुखावला असेल त्याला फटकारल्यावर." मी जरा चुकलोच होतो हे आतून जाणवत होत, पण ती वेळच अशी होती की काय करणार. नेहमीप्रमाणे आवरल आणि गेलो ऑफिसला. कामाच्या धबडग्यात विसरून गेलो सकाळची घटना. तस पाहिलं तर क्षुल्लक घटना. संध्याकाळी नेहमीप्रमाणे साडे आठच्या सुमाराला पोचलो घरी. नेहमी सारखा दंगा नाही, टीव्ही सिरियलचा आवाज नाही, कानावर काहीच येत नव्हत. बायको म्हणाली "अहो आज त्याला शाळेत लागलं बघा, जरा कमी डोळा वाचला. आत झोपलाय आल्यापासून " काळजात धस्सं झालं. पायातले बूट पण न काढता तसाच आत पळालो. बघितलं तर डाव्या कुशीवर अंगाचे मुटकुळे करून चिरंजीव झोपले होते. अंग पण गरम लागत होत. हनुवटीला धरून चेहेरा माझ्याकडे फिरवून बघितला तर खरंच डोळ्याच्या खाली काळ निळं झाल होत. नाक सुजल्या सारख झाल होत. पुन्हा पुरुषी अहंकार जागा झाला. बायकोवर डाफरणे सुरु झालं. "तू मला का कळवलं नाहीस?, शाळेत विचारलस की नाहीस? इतक लागल पण मला कळवावे अस वाटलं नाही का तुला? जे तोंडाला येईल ते बोलत गेलो. बायको मात्र शांत होती. थोड्या वेळाने बडबड शांत झाल्यावर म्हणाली, "जरा मोबाइल बघा किती मिस्ड कॉल आहेत ते?" खरंच पंधरा ते वीस मिस्ड कॉल होते. साडेतीन ते साडेसहा या दरम्यानचे. माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे बायकोचा कॉल घेणे, अथवा नंतर परत कॉल करून तिला विचाराणे  की तू कॉल का केला होतास हे मी नेहेमीच टाळत आलोय याची प्रखर्षानें जाणीव झाली.
"आल्यापासून सारखा रडत होता, बाबांना सॉरी म्हणायचं आहे, मी काही नाही केलं ग,फोन लावून दे, त्यांनाच  सगळं सांगतो म्हणून हट्टून बसला होता. काय झालाय ते मला सांगायला तयार नव्हता. कशी तरी समजूत घातलीं, डोळ्याखाली औषधं लावलं , नाकावर औषधं लावलं, बाबा आज लवकर घरी येणार आहेत आल्याआल्या तू त्यांना सॉरी म्हण हं, अस म्हटल्यावर कुठे त्याची समजूत पटली. मग सगळं सांगितलं.  दुपारच्या सुट्टीत पाणी पिताना दुसरी मूल भांडत होती, त्यातल्या एकाचा ह्याला धक्का लागला. नळावर तोंड आपटलं मित्रांनीच मॅडमकडे नेलं, औषध लावल हे सगळं त्याला तुम्हालाच सांगायचं होत. आल्यावर जेवला नाही, दुधपण नाही घेतल, तसाच पडून होता. बाबा तुझा फोन पण उचलत नाहीत, अजून माझ्यावर रागवलेत आणि माझ्या डोळ्याला लागलाय म्हटल्यावर अजून चिडतील. तू आत्ताच फोन लावून दे मी सांगतो त्यांना सर्व काही. मीच मग कशीतरी समजूत काढलीं अरे बाबाना खूप काम असत, दुपारचं जेवण पण ते कधी वेळेवर घेत नाहीत, मीटिंग मध्ये असतील ते आपण नको त्यांना त्रास द्यायला. आपल्या मुळे त्यांचे सर त्यांना ओरडू देत का? आणि तू जर औषध नाही लावून घेतलस तर त्यांना अजून राग येईल हं. अस म्हटल्यावर जरा कुठे पटलं त्याला. औषध लावून घेतलं, पण दवाखान्यात यायला तयार नाही झाला. बाबांच्या बरोबरच जाईन म्हणाला. काहीही न खाता तसाच झोपला बघा."
मी तरी काय बोलणार, मीच प्रत्येक ठिकाणी चुकलो होतो रे, सकाळी पण त्याला उगाच मारलं. त्यालासुद्धा आतून काही तरी होत असेल म्हणूनच तो आज शाळेत जायला नको म्हणतोय हे मला कळलंच नाही. दोन फटके दिले कि पोरं ऐकतात, नाहीतर प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकली कि शेफारतात हे ड़ोक्यात अगदी फिट्ट बसलय ना. त्यात सकाळी ती सुद्धा मला काही बोलली नाही फक्त हात अडवला तिनं. तेंव्हा पण माझ्या काही लक्षात आलं नाही. तिचे दुपारी इतके कॉल येत होते, मी नेहेमी प्रमाणे उचलले नाहीत. नेहमी प्रमाणे रोजच्याच काहीतरी कटकटी सांगायला फोन केला असेल म्हणून दुर्लक्ष्य केलं, आणि नंतर फोन करून तिला विचारलपण नाही. हेच जर मी तिचा कॉल उचलला असता किंवा थोड्या वेळाने तिला परत कॉल केला असता तर पटकन घरी जाऊन त्यांना दवाखान्यात नेता आल असत. पण नाही, स्वतःचा अहंकार जपायचा होता ना मला. पण हेच जर ती अस वागली असती तर मी तिला माफ केलं असता का? तिनं किती सहजतेनं मला माफ केलं ? आमच्या बोलण्याने तो जागा झाला होता. त्या दोघांच्या देखत स्वतःचे डोळे ओले आहेत हे स्वीकारणेपण मला जड  झालं. मला बघताच माझ्या गळ्यात पडून तो न केलेल्या चुकी बद्दल सॉरी म्हणून हुमसून हुमसून रडायला लागला. त्याला समजावणं मलाच अवघड होत, पण नेहेमीप्रमाणे तीच पुढे आली, त्याला पटकन उचलून म्हणाली, " अरे ते तुझ्यावर नाही , माझ्यावर चिडलेत, इतका वेळ त्याला डॉक्टरकडे का नेलं नाही म्हणून.? आणि हळूच मला खुणेंन तयारी करायला सांगितली.
आता मात्र माझी मलाच लाज वाटायला लागली, एवढस पोरं सकाळी मार खाऊन शाळेत गेलं. शाळेत धडपडल, जरा कमी डोळा वाचला त्याचा. आणि एवढ सगळं होऊन, मी मारलेलं विसरून, बाबाना काय वाटेल याची चिंता करत होत.  बाबानी उगाचच मला फटके मारलेत हे विसरून त्यानं मला नकळत माफही केलं होत, बायको सुद्धा सकाळी काही म्हणाली नाही, तुम्ही चुकलात त्याला मारायला नको होत, तुमच्या मुळेच हे सार घडलं, आज एक दिवस पोर शाळेत गेलं नसत तर काय बिघडलं असत?, एक साधा फोन तुम्ही उचलू शकत नाही?, असं काय जगा वेगळं काम तुम्ही करता? आणि फोन उचलायला नाही जमलं त्या वेळी तर नंतर तरी करू शकता कि नाही? ह्यातलं एक हि अक्षर न बोलता, चूक माझ्याकडून घडलेली असताना सुद्धा त्या बद्दल एक अक्षरही  न बोलता ती अतिशय समजुदारपणे ह्या प्रसंगात मला सावरत होती. कुठल्याही मनजेमेंटचे कोर्स न करता ही घटना ती हळुवारपणे पण समर्थपणे सांभाळत होती.
"सांग मला, आता एवढं शिकून, कॉर्पोरेटमध्ये काम करुन पण आपण कसं वागतो? आणि घरातली सगळी कशी वागतात? कोण समजुद्दार आहे आपण की ते?" हा प्रश्न माझ्या साठी होता हे मला कळायला थोडा उशीर झाला. अस वाटत होत कि जणू मीच त्या प्रसंगात आहे आणि मित्राऐवजी मीच हे सार प्रत्यक्ष जगतोय. थोड्या फार फरकाने माझ्या बाबतीत पण हेच घडत होत, पण मी असा विचार कधीचं केला नव्हता.
सांग की कसं वागायला पाहिजे होत मी? काय सांगू मी तरी, माझ्याही बाबतीत असे प्रसंग घड्लेत पण मी असा कधीचं  विचार केला नाही रे अजून. " तर मग कर विचार. सहजता हेच एक साधन आहे आपल्याकडे ह्या प्रसंगात वापरायला. कारण ती गोष्ट घडत असताना आपण सारासार विचार करत नाही. आणि वेळ गेल्यावर पश्चातापाशिवाय हाती काही उरत नाही. तेंव्हा प्रत्येक गोष्टीकडे सहजतेने बघ, हे असेच घडणार होते हे मनाला पटवायला शिकव, म्हणजे अहंकार दुखावणारपण नाही आणि मुख्य म्हणजे सुखावणारपण नाही. दोन्हीही गोष्टी घातकच. ह्यातून सुयोग्य मार्ग म्हणजे घडलेला प्रसंग सहजते स्वीकारणे आणि त्यावर ताबडतोब कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळणे म्हणजेच जगण्यातली खरी सहजता. काही काही प्रसंगात आपण उगाचच अर्थाचा अनर्थ करतो, स्वतःचा खोटा अहंकार जपतो, आणि मुख्यत्वे त्या घडलेल्या घटनेबद्दल करणे देत बसतो. चुकांचे भले मोठे गाठोडे असंख्य कारणांच्या खांद्यावर लादून आयुष्यभर स्वतःला बांधून घेतो आणि दोष मात्र देतो दुसर्यांना. -- ------------------ माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग असो की माझ्या, किंवा आणि कुणाच्या, पात्रे कुठलीही असोत कर्ते तर आपणच ना ?? घटना थोड्याफार फरकाने वेगळ्या असतील पण त्या किती सहजतेने आपण हाताळतो ह्यावरच सर्व अवलंबून आहे. होय ना, पटलं का???????

Friday 11 May 2018

आठवण

 आठवण

शाळेच्या बाकावरती बसल्यावर नेहमी बाहेरचे जग सुंदर दिसायच.
नेहेमी वाटायच, की किती छान आहे यांचं जगणं. कधीही, कुठेही, केंव्हाही व कसंही जा, कोणाची आडकाठी नाही की भिती  नाही. कसलंही बंधन नाही. मनसोक्त फिरा. कुठे गेला होतास, कुणा बरोबर होतास, काय करत होतास, प्रश्नांची सरबत्ती नाही. फक्त मुशाफिरी. किती भाग्यवान आहेत हि मोठी लोक. हवे ते कपडे, छान पैकी सायकल (हो..  माझ्या लहानपणी मनासारखी सायकल, हे एक स्वप्नच होत) आणि केसांचा कोंबडा (खेडेकर सरांचा शब्द.  - माझे मराठीचे सर.) करून फिरत असतात. नाहीतर आम्ही, रोज सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत शाळेत... आपण पण लवकर मोठं व्हावं, पैसे कमवावे, हवे तसे खर्च करावे.. क्या बात हे!

 पण म्हणून शाळा आवडत नाही, अस अजिबात नाही हं. वर्षातला एकही दिवस कधीहि शाळा चुकवली नाही. अगदी बर नसताना सुद्धा. आई तर अजूनसुद्धा म्हणत असते, बर नसल कि तुला शाळेत जायचा ऊत यायचा. रोज वेळेच्या आधी अर्धा एक तास तरी शाळेत पोचायचो. घरातूनच लवकर बाहेर पडायचं हे ठरलेलंच. त्यासाठी आदल्या दिवशी पासूनच तयारी केलेली. गृहपाठ (हो आम्ही गृहपाठाच म्हणायचो, कारण होम वर्क असा शब्द त्यावेळी मराठी शब्द कोशात समाविष्ट नव्हता. माझी मुलगी मला ठसक्यात ठणकावते ... बाबा गृहपाठ नाही हो होमवर्क करायचा आहे  मला.  आणि हो माझी मुलगी मला बाबाच म्हणते... तिलाही आवडत आणि मला ही.) तर गृहपाठ करून, सर्व वह्या (आताचे नोट बुक ) कंपास पेटी (त्यातही कॅमल ची असेल तर फारच अभिमानाने) पुस्तके दप्तरात (स्कूल बॅग हो बाबा.. इती कन्या..) भरून खिडकीच्या खोबणीत किंवा दाराच्या मागे ठेऊन द्यायचं, म्हणजे सकाळी अजिबात गडबड नाही. अंघोळ एक्दम कोमट पाण्याने. ओलसर केसात थोडेसे खोबरेल तेल भरपूर चोळून लावलेलं. पांढरा शर्ट व खाकी अर्धी चड्डी. तेंव्हा फक्त कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांनां फुल्ल पॅन्ट असायच्या. घरापासून शाळा बहुतेक आठ एक किलोमीटर लांब असेल. सायकलमध्ये हवा नेहेमी भरून ठेवलेली. गरम गरम चहाच्या वाफां बघत शिळी चपाती चहात बुडवून खायची सवय तर आम्हां सर्व मुलांमध्ये समान होती. मुलीं बद्दल माहित नाही.... बहुतेक तीच असावी. मुलींशी बोलणे दुरापास्त, तर त्यांच्या सवईंबद्दल माहिती असणे म्हणजे.....
चहा संपला रे संपला की " ए...  आई, येतो ग. ... " " शिस्तीत जा रे, हायवे  वर  सायकल जोरात पळवू नकोस. शाळा सुटली कि सरळ घरी यायचं..."  "बोंबलत फिरत बसू नकोस मित्रांबरोबर" हे वाक्य कंसात असायचे. (आजच्या भाषेत सायलेंट - जस सायकॉलॉजि मध्ये P असत तस )  चाळीतलं घर आमचं. तीन सरळ खोल्या रेल्वेच्या डब्यांसारख्या सरळ. अंगणातले बांबूचे गेट व्यवस्थित बंद केलेले असायचे. आतून व बाहेरून मेंदीची झाड लावून भक्कम केलेलं. दोन बांबू बाजूला सरकवले कि सायकल बाहेर काढून परत गेट बंद करायचा हा शिरस्ता नाहीतर गुरं आत येऊन शेणाने सारवलेलं अंगण उकरून ठेवणार हे ठरलेलं. तस  बघितल तर अंगण करायचं म्हणजे माती उकरून त्यात पाणी मारून धोपटण्याने धोपटून धोपटून एक सारख केल जायचं. नंतर मग चाळीतल्या सर्व बायका एकत्र येऊन ते शेणाने सारवून घ्यायच्या. अर्थात हे शेण आम्हीच सर्व मुलांनी आसपासच्या चौंडयातून गोळा केलेलं. चौंडा म्हणजे शेताचा तुकडा, कोकणात जमीन माणसांसारखी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ना, त्यामुळे वेगळीवेगळी, तुकड्या तुकड्यांची. अंगण करायचा कार्यक्रम हा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दर वर्षी ठरलेला.  मुलांना हुंदडायला भरपूर जागा मिळावी म्हणून.
एकदा का सायकलला टांग मारली कि चाळीतून बाहेर पडून एकच माणूस जाऊ शकेल अशी पायवाट ओलांडायचो . दोन चौंडयांना वेगळं वेगळं करणारा मातीचा बांध म्हणजे आमचा रस्ता. त्यावरून जोरात सायकल पळवत मुख्य रस्त्यापर्यंत यायचं. मग यायचा मेन रोड. मुंबई हायवे. त्यामुळे रहदारीचा. शाळेपर्यंत पोचताना दोन मोठे नाके लागायचे. तिथून सायकल फिरवायला  जास्त मजा यायची. वाटेत एक मोठे कॉलेज लागायचे... तमाम शाळकरी वर्गबंधूंचे आकर्षण. मुलं मुली एकत्र बोलताना पाहून हुरळून जाणारे आम्ही सर्व शाळकरी जीव. तिथे आपसूक पाय रेंगाळायचे. सायकलची गती (सॉरी स्पीड ) आपोआप कमी व्हायची. आज काय छान  बघायला मिळतंय का याची उत्सुकता व ती घटना वर्ग सुरु झाल्यावंर बाकबंधूला (आजच्या भाषेत बेंच मेट) सांगायची अनावर इच्छा. एकदा का ते कॉलेज मागे सरले कि आपोआप सायकलचा वेग वाढायचा. आपल्याच वेगाने जाणारा एखादा सायकलस्वारांचा  घोळका ओलांडून पुढे जायची उर्मी. मोठठं गेट ओलांडून दुतर्फा अशोकाच्या झाडांच्या सावलीतून सायकल स्टॅन्ड मध्ये सायकल लावली कि पाय वळायचे कोपऱ्यातल्या वर्गाकडे. एक चेहेरा दिसे पर्यंत सगळ्या खिडक्या धुंडाळुन व्हायच्या. पण दारातून आत जाऊन वर्गावर नजर टाकायची अनावर इच्छा कधीतरीच पूर्ण व्हायची. एक तिरका कटाक्ष व क्षणिक नजरानजर....  गालावरून मोरपीस फिरल्याचा भास.
एखाददुसरा मित्र सोडला तर वर्गामध्ये एवढ्या लवकर कोणीच आलेलं नसायचं. बेंचवर दप्तर ठेऊन पाणी पिण्याच्या निमित्याने एक चक्कर आवर्जून व्हायची कोपऱ्यातल्या वर्गावरून.... तोपर्यंत एक एक भिडू येताना दिसायचा. कधी टोपण नावाने, कधी तीर्थरुपांच्या नावाने तर कधी ....... त्या नावाने एकमेकांना हाक मारत.  वर्गाचा किलबिलाट सुरु व्हायचा. त्यात मुलांपेक्षा मुलिंचाच चिवचिवाट जास्त असायचा हे ओघाने आलंच. म्हणून तर आमच्या वर्गातल्या पहिल्या दोन बाकावर बसणाऱ्या मुलींचे चिमण्या हे बारसे झाले होते. प्रार्थनेची घंटा व्हायच्या आधी मूल्य शिक्षणाचा पाठ दररोज वहीत लिहून पूर्ण करायची शिक्षासुद्धा आम्हाला हवी असायची. .... का काय? ..... नाही कळलं.... 
जाऊ दे. तो पर्यंत घंटा कानावर पडायची व लिखाण आणि बरंच  काही आवरतं घेऊन वर्गात पळायचं. प्रार्थना व्हायची ..

"अहो अजून ती उठली नाही, दात घासून व्हायचे आहेत तिचे, काल स्कुल बॅग सुध्दा नाही भरली तिने. बुटाला पॉलिश तेवढे तुम्ही करा तोपर्यंत मी तिचा डबा आणि वॉटरबॅग भरते. तुमचा नाश्ता तयार आहे.   अहो अजून आरश्या समोर काय करताय, ऐकताय ना...... अहो ऐकलं का मी काय म्हणते ते.. ..आमच्या ह्यांचं हे रोजचच आहे. रोजसकाळी त्या आरश्या समोर उभारून काय करतात देव जाणे. "

सकाळ सकाळची एक रम्य आठवण, रोज आठवणीने येणारी........ आणि माझ हे स्वप्न जणू माझ्या लेकीच्या डोळ्यात असेल जे मोडू नये म्हणून तिला हळू आवाजात हाक मारायला जाणारा मी.

 "पिलू ए पिलू उठ शाळेत जायचं ना"