कळत नकळत कधी अचानक,
जुळतात अशी ही नाती,
सहवास यांचा हवाहवासा,
जशी पावसात दरवळणारी माती.
ऋणानुबंध म्हणू की यांना स्वर्गातील रेशीमगाठी,
कुणीही नाही कुणाचे तरीही जगतात एकमेकांसाठी.
अंत न पाही विरह हा केवल,
स्वप्नही सलते कणकण रतिभर,
कुठे खोलवर जखम जन्मभर,
निशब्ध ओठ, मनाचे ओघळ...
तो स्पर्शही असे मखमलीचा,
चंदन गंधित अत्तर ल्याला,
डोळा साठवुन ठेवी काही,
निधडी छाती बोले केवळ.
अबोल निर्झर न राही अंती,
ढग स्पर्शूनही जाई माती,
अलगद हळुवार मोरपिसासम,
आठवण ठेऊनी जाती.
कळत नकलत कधी अचानक,
जुळतात अशी ही नाती,
सहवास यांचा हवाहवासा,
जशी पावसात दरवळणारी माती.
No comments:
Post a Comment